पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग) – राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे हे सरकार त्यांच्याच वजनामुळे पडेल. या निवडणूकीच्या निकालामधून महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्व आणि राज्य सरकार बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल, असा दावा पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.
पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीचे आज मतदान होत आहे. खासदार गिरीश बापट यांनी पुणे शहरातील अहिल्यादेवी हायस्कूल येथे पुणे पदवीधर निवडणुकीसाठी मतदान कुटुंबीयांसह केले. त्यानंतर प्रसार माध्यमाशी ते बोलत होते.
यावेळी खा. बापट म्हणाले, राज्यातील महाआघाडी सरकार कोरोना महामारी हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. महापूर, अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वार्यावर सोडले. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी असून, महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. मंत्री एकाच विषयावर वेगवेगळे मत व्यक्त करत आहेत. त्यामुळे हे सरकार आम्हाला पाडण्याची गरज नाही. हे त्यांच्याच वजनाने पडेल.
गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. यामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. या गोष्टीचा फायदा भाजप मित्र पक्षाला पदवीधार व शिक्षक निवडणुकीत होईल, असा अंदाज खा. बापट यांनी व्यक्त केला.